सफर गडकिल्ल्यांची - किल्ले सामानगड

•─────✧─────•
सफर गडकिल्ल्यांची 

 🎠 *किल्ले सामानगड* 🎠

नाव      -      सामानगड किल्ला
उंची  -  समुद्रसपाटीपासून २९७२ फूट उंच
प्रकार     -     गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी      -      सोपी
ठिकाण    -     कोल्हापूर, महाराष्ट्र
जवळचे गाव    -      नौकूड
सध्याची अवस्था     -    चांगली

          *कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.. या भागाची सबनिशी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.*

       *पहाण्याची ठिकाणे*

       *शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक वर्षं उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते, त्याच्या अगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. या किल्याचे असे एतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही .माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांतून किल्याचा थोडाबहुत विकास झाल्याचे आढळते. दुर्लक्षित असलेला पण निसर्गरम्य असा किल्ला पहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागते. पुणे बेंगलोर महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते.*

      *गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे गडाच्या पठारावर पायउतार झाल्यावर चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करता येतो. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरूज बांधलेले आहेत.*

       *गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने गडाच्या तटावर गेल्यावर तटावरुनच निशाण बुरुजाकडे जाता येते. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली विहीर लागते. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पूर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत.*

     *अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते. या विहिरीतही उतरण्यासाठी पायऱ्या असून, पायऱ्यांवर सुंदर कमानी आहेत. पायऱ्या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे.*

     *मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब दिसतात. त्याचे प्रयोजन अद्याप कळलेले नाही. पुढे एक चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंड्या बुरुज लागतो. सोंड्या बुरुजासमोर मुगल टेकटी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी अाख्यायिका स्थानिक लोकांत आहे.*

        *गड पाहून झाल्यानंतर गडावरुन सरळ जाणाऱ्या सडकेने १५ मिनिटे चालल्यावर मारुती मंदिर लागते. या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पायऱ्या उतरुन आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळ्या आहेत. येथून उतरल्यानंतर डांबरी सडकेने पुढे गेल्यावर भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड व खूप मोठ्या प्रमाणात हिरवळ आहे.*
─── ❖ ── ✦ ── ❖ ───

Post a Comment

0 Comments